पुणे : ‘मानवतावादाची ज्योत तेवत राहावी, यासाठी गझल झटत असते. गझल वेदना नाकारत नाही, तर स्वीकारते व क्षमाशीलही होते. यातूनच मानवी प्रवृत्ती श्रीमंत होण्यास हातभार लागतो,’ असे प्रतिपादन डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर लिखित बेफिकिरी व कथाकारी या गझल व कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
‘कवींचा धर्म किंवा जात बघणे अन्यायकारक आहे. त्यांना वैश्विक जाणिवेतून व सांस्कृतिक एकात्मतेच्या परिप्रेक्ष्यातून बघायला हवे. कटककरांची गझल प्रामाणिक आहे. मराठी रसिकांना अस्सल दाद देणे अजूनही शिकावेच लागत आहे, याची मात्र खंत वाटते,’ असेही डॉ. सबनीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘व्यक्तिरेखांच्या जिवंतपणावर कथेचे यश अवलंबून असते. प्रतिभासंपन्न लेखक परंपरेच्या चौकटीत वावरत नाही. अतिशय गंभीर विषय सूचकपणे मांडणे ही हातोटी लेखकांनी आत्मसात करायला हवी. कटककरांच्या कथा वाचून व त्यातील चिंतनसूत्रे पाहून हादरून जायला होते.’
या वेळी ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, अॅ ड. प्रमोद आडकर, यशश्री कटककर व भूषण कटककर उपस्थित होते.
अॅड. आडकर म्हणाले, ‘दैवदत्त देणगीचा अचूक वापर करून कलानिर्मिती करण्यातच कलाकाराच्या आयुष्याचे सार्थक आहे.’
म. भा. चव्हाणांनी दोन्ही पुस्तकांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लेखक भूषण कटककर म्हणाले, ‘आपल्यातील प्रतिभा क्षमता ओळखून वेळीच तिचे साहित्यिक आविष्कार समाजासमोर आणणे हे लेखक व कवींचे कर्तव्य आहे. वेदना हा लेखनाचा पाया असायला हवा. लेखन हातून होऊन गेल्यावर लेखकाने त्याबाबत तटस्थ व्हायला हवे’.
या वेळी यशश्री कटककर यांच्या हस्ते सुप्रिया जाधव, प्रज्ञा महाजन, निशिकांत देशपांडे, स्वाती सामक, दीप्ती जोशी, सुनीति लिमये, मुक्ता भुजबले व चिन्मयी चिटणीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात झालेल्या गझल मुशायऱ्यात डॉ. कैलास गायकवाड, शांताराम खामकर, प्रमोद खराडे, मिलिंद छत्रे, वैभव कुलकर्णी, सुप्रिया जाधव व प्राजक्ता पटवर्धन सहभागी झाले होते.
दीप्ती जोशी व डॉ. कैलास गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ता भुजबले व चिन्मयी चिटणीस यांनी आभार मानले.